मुंबई : राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपलं तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना हा अवकाळी पाऊस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


कोल्हापुरात हिमवर्षाव
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर आज हिमवर्षाव झाला. धनगर वाड्यावरील नागरिक भयभीत झाले असून 20 बकऱ्या जखमी झाल्या आहेत. वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्याला सुमारे एक तास झालेल्या गारांच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पाढंर्‍या शुभ्र पडलेल्या गारांच्या सड्यामुळे काश्मीरमध्ये बर्फ पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. सुमारे एक तास झालेल्या गारांच्या वर्षावाने धनगरवाड्यावरील नागरिकांची पळता भुई थोडी झाली.


चंद्रपूर
राज्यभर अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असताना चंद्रपूर शहरात देखील पावसाने आज हजेरी लावली. आज दिवसभर ढगाळ हवामान अनुभवल्यावर चंद्रपूरकरांना संध्याकाळी पावसाने दिलासा दिला. जिल्ह्याच्या काही भागात जोरदार सरी तर शहरात रिमझिम पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने काही काळ वाहतूक धीमी केली होती. चंद्रपुरात पावसामुळे ऐन फेब्रुवारीत थंडीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. लांजा तालुक्यातील पूर्व भागात दुपारपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी शिपोशी गावात गारा देखील कोसळल्या. या अवकाळी पावसात लहान मुलांनी भिजण्याचा आनंद लुटला. सद्यस्थितीत लांजा तालुक्यात पाऊस कोसळत असून पावसाच्या जोडीला सोसाट्याचा वारा आणि गारा देखील कोसळत आहेत. रत्नागिरी शहरात सध्या ढगाळ वातावरण असून अधूनमधून विजा चमकत असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजु पिकाला देखील फटका बसणार आहे. यापूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि काजु उशिरानं आलं आहे. त्यात अवकाळीचं संकट आल्यानं आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था कोकणातील शेतकऱ्यांची झालीय. मध्यरात्री देखील जिल्ह्यातील साखरपा आणि देवरूख भागात जवळपास तासभर अवकाळी पाऊस कोसळला.


साक्री तालुक्यात गारपीट
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गुरुवारी सायंकाळी गारपीटीसह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तसेच या गारपिटीमुळे डाळिंब, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


भोकरदन तालुक्यात आज वादळी पावसासह जोरदार गारपीट
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आज वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा गारांचा पाऊस झाला, तालुक्यातील इब्राहिमपूर मालखेडा, आव्हाना, आलापूर, प्रल्हादपुर भागात अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झालंय. नुकताच काढणीला आलेला गहू, आंबा, मोसंबी आणि हरभऱ्याचे देखील नुकसान झालंय. तालुक्यातील या गावातील रस्त्यावर आणि शेतात पावसाने अवघ्या काही मिनिटात गारांचा खच जमा झालेला पाहायला मिळाला.


वर्धा जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलायं. वर्ध्यासोबतच अनेक गावांत पाऊस झालाय. देवळी तालुक्याच्या रोहणी, शिरपूर, मलातपूर शिवारात तुरळक स्वरूपात गारपीट झालीयं. जवळपास पाच मिनिटापर्यंत छोट्या बोरांच्या आकाराची गार या भागात झालीय. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विरगाव, मस्की गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय तर लोणी खुर्द गावात वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली आहे.


अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपले आहे. सटाणा, देवळा, कळवण दिंडोरी तालुक्यातील विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात गारपीट, कांदा, द्राक्ष पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. मागाचीच नुकसान भरपाई मिळाली नसताना शेतकऱ्यांसमोर पुन्हा अस्मानी संकट उभं राहीलं आहे. मनमाडसह परिसरात विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाची हजेरी.


रायगड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. खोपोली खालापुरात अवकाळी पाऊस बरसला. सायंकाळच्या सुमारास महाड, पोलादपूर, पाली सुधागडमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. कर्जत परिसरात देखील अवकाळी पाऊस पडला. तर पनवेल, कामोठेमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.