Weather Updates News : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात सध्या पाऊस आणि थंडीचा खेळ आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात थंडीचा कडाखा वाढला आहे. तसेच मुंबईतही (Mumbai) तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडं मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. त्यामुळं मुंबईतही थंडी वाढली आहे. तर थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 अंश आहे. मुंबईत सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी वाजत आहे. 


जळगाव जिल्ह्याचा पारा 9 अंशावर 


जळगाव जिल्हा उच्च तापमानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा 9 अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. 
उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


या भागात पावसाचा अंदाज 


महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या  आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. दरम्यान अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी  पावसानं हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. 


गेल्या 122 वर्षांतला 2022 चा डिसेंबर महिना सर्वात उष्ण


गेल्या 122 वर्षांतला 2022 सालचा डिसेंबर महिना हा सर्वात उष्ण ठरला आहे. सरासरी तापमानाच्या 1 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सरासरी तापमान 21.49 अंश सेल्सिअस राहिलं आहे.  सोबतच डिसेंबर महिन्यातील किमान आणि कमाल तापमान देखील सर्वोच्च राहिल्याची नोंद झाली आहे. भारताला जागतिक तापमानवाढीचे चटके बसत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम, तुडतुडा रोगासह मोठ्या प्रमाणात फळगळ