पुणे: राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता (Maharashtra Weather Update) वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तो आता गुजरातमधील कच्छपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा २४ तासांत तयार होणार आहे. याच्या परिणामामुळे राज्यातील पाऊस वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे. (Maharashtra Weather Update) 


यलो अलर्ट : पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.


ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड.


आगामी तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस


पुणे शहर, परिसरासह पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी सायकांळी विजांचा कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन जाणवत आहे, उकाडाही वाढला होता.(Maharashtra Weather Update) 


अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले


अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले होते. अहमदनगर शहराच्या बाजूने वाहत असलेल्या सीना नदीला पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पाण्याने नगर - कल्याण महामार्ग वरील पूल पाण्याखाली गेला आहे. नगर - कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. हवामान खात्याने तीन दिवस नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आज पासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.