Akola Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपने देखील आपल्या आमदारांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यामध्ये विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यामध्ये भाजप आपली ताकद वाढवून सर्वच 5 मतदारसंघ आपल्याकडे घेणार की ठाकरे गटाचा बंड झाल्यानंतर गेलेला आणि अर्ध्या रस्त्यातून परत आलेला आमदार आपला गड राखून आणखी ठिकाणी आपल्या पक्षाची मशाल पेटवणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.  


अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट भाजपच्या ताब्यात असून बाळापूर येथे शिवसेना ठाकरे गट व रिसोडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त असली तरी हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. 


 सध्याचे अकोला जिल्ह्यातील आमदार : (Akola MLA List)


अकोट विधानसभा - प्रकाश भारसाकळे (भाजप)
 बाळापूर विधानसभा - नितीन देशमुख  (शिवसेना - उद्धव ठाकरे)
अकोला पश्चिम विधानसभा - गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
अकोला पूर्व विधानसभा - रणधीर सावरकर (भाजप)
मूर्तिजापूर विधानसभा -  हरीश पिंपळे (भाजप)


2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य


1) अकोट विधानसभा -


भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रकाश गुणवंतराव भारसाकळे 48,586 मते मिळवून विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अ‍ॅड. संतोष वसंत रहाटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर हे 7,260 इतकं होतं.


2) बाळापूर विधानसभा -


बाळापूर मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेने बाळापूर किल्ला काबिज करून भगवा फडकवला. सेनेचे नितीन देशमुख उर्फ नितीन टाले यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना मात देत, 18 हजार 788 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी 69 हजार 343 मते घेतली. देशमुख हे 18 हजार 788 मतांनी विजयी झाले. महाआघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांना 16 हजार 497 मते मिळाली. गावंडे यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार तुकाराम दुधे यांनी 6 हजार 262 मते घेतली. दुधे यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. बाळापुरच्या किल्ल्यावर प्रथमच भगवा फडकला होता. 


3) अकोला पश्चिम विधानसभा -


 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा आणि काँग्रेसचे उमेदवार साजीद खान यांच्यात लढच झाली. यामध्ये साजीद खान यांना 67 हजार 629 हजार मते मिळाली तर भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या 2662 मतांनी निसटता विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान यांचा पराभव झाला होता.


4) अकोला पूर्व विधानसभा -


अकोला पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी गड कायम राखण्यात यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सावरकर यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे हरीदास भदे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहूमान मिळविला. रणधीर सावरकर 24723 मताधिक्याने विजयी झाले.


5) मूर्तिजापूर विधानसभा -


अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपचे विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांनी वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यावर निसटता विजय मिळविला. पिंपळे यांना 59227 मते मिळाली, तर प्रतिभाव अवचार यांना 57613 मते मिळाली. पिंपळे 1610 मतांनी विजयी झाले. 


राजकीय परिस्थिती -


2019 मध्ये लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही या अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) भाजपचं वर्चस्व दिसून आलं. बाळापूर आणि रिसोड वगळता इतर चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले.बदललेल्या राजकीय गणितांचाही या मतदारसंघावर फारसा परिणाम दिसून येत नाही. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची फार मोठी शक्ती दिसत नाही. त्यामुळं त्यांच्यातील विभाजनाचा इथं फार काही परिणाम झालेला नाही. यावेळी पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच विधानसभेला प्रकाश आंबेडकर संपूर्ण ताकदीने सामोरे जातील किंवा त्यांनी कोणत्या पक्षांसोबत मिळून याठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा राजकीय गणित बदलण्याची शक्यता नकारता येत नाही. 


सध्या सुरू असलेल्या एकंदरित राजकीय परिस्थितीवरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी यांच्या एकत्र येण्याच्या शक्यता मावळल्या असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा याठिकाणी युती, आघाडी आणि आंबेडकर अशी तिरंगी लढतच पाहायला मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.


शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता - 


शिवसेना पक्षफुटीनंतर आणि एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार नितीन देशमुख हे पुन्हा परत आले, त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्याबाबतचा पक्षातील आदर,आणि त्यांची पक्षाविषयी असलेली निष्ठा याच्या प्रभावामुळे या जिल्ह्याच शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.