औरंगाबाद : राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीत जाण्याची चिन्हे आहेत. निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळापासून सावधान रहा, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.


पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये हा उन्हाचा कडाका आपल्याला लाही-लाही करू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत 2 ते 3अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे.


गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरीही लावली. काही भागांत गारपीटही झाली. या कालावधीत कमाल तापमानात घट झाल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाल्याने तापमानात हळूहळू वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या काळजी घेण्याचे आवाहन  डॉक्टर करत आहेत.


आपल्या चिमुकल्यासह इतरांचीही काळजी घ्या
येत्या 2 ते 3 दिवसांत काही ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे जाऊन चाळिशीत जाण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या सर्वच ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांदरम्यान किंवा त्यापुढे आहे. ब्रह्मपुरी येथे सोमवारी राज्यातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारीही या ठिकाणी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. ते देशातील उच्चांकी तापमान ठरले. कोविडची स्थिती पाहता एकच गोष्ट चंगली आहे की लोक वाढत्या तापमानाचा पारा पाहता घरी आहेत असं असलं तरी वाढत्या तापमानामुळे आपल्या चिमुकल्यासह इतरांचीही काळजी घ्या.