मुंबई : राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला.  त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झालीय. सकाळी 9 ते 11 या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही. 


महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून  मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. 


अकोला जिल्ह्यातील तलाठी भरती पेपरचा खोळंबा


अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती.  सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली आहे. त्यामुळे अद्यापही परीक्षा केंद्राबाहेरच आहेत. 


नागपूरमध्येही तलाठी परीक्षेचं सर्व्हर डाऊन


 नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा सुरू झालेली नाही. नागपूरच्या vmv महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त करत आहे. 


 लातूरमध्ये विद्यार्थी संतप्त


 महाराष्ट्रभरातून आलेले  विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते  .मात्र त्यांना कोणतेही सूचना अद्यापपर्यंत  देण्यात आली नाही. नऊ वाजून गेल्यानंतर सेंटरमधील कर्मचारी सांगत आहेत की काही तांत्रिक चुकांमुळे आम्ही परीक्षा पुढील सत्रात घेऊ? यामुळे यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI