मुंबई : महाराष्ट्रातील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. कारण महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत. मेट्रो, एअरपोर्ट यासारख्या अनेक ठिकाणी ही कंपनी सुरक्षा पुरवते.


मुंबई मेट्रोतील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे मेट्रोने सध्या प्रायव्हेट सुरक्षा पुरवली आहे. मात्र आता घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊन्टर आणि तपासणी काऊन्टरवर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत 'महाराष्ट्र सुरक्षा बल' ही कंपनी येते. कंत्राटी पद्धतीने याचं काम चालतं. मात्र सकाळच्या शिफ्टमधील सुरक्षारक्षकांनी संप पुकारल्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षाविषयक अडचण निर्माण झाली आहे.

मेट्रो, एअरपोर्ट, टोल नाका, टाटा हॉस्पिटल, मोनो रेल याचप्रमाणे राज्यातील अनेक देवस्थानांना ही कंपनी सुरक्षा पुरवते. पगारवाढ आणि कायम करण्याच्या मागणीसाठी सुरक्षारक्षकांनी संप पुकारला आहे.