मुंबई: एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरं जावं लागू शकतं. कारण तोटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरु केल्या आहेत.


त्याचाच भाग म्हणून सर्व प्रकारच्या एसटी तिकीटांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. लालपरी ते शिवनेरी अशा सर्व एसटीच्या भाड्यात वाढ प्रस्तावित आहे.

राज्य परिवहन आयोगाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ लागू होणार आहे.

इंधनाचे वाढते दर, वेतन करार अशा विविध कारणांमुळे ही भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार 1 मे रोजी होणार असल्याची घोषणा केली.

त्यामुळे त्यासाठी प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आधीच खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे दर जास्त आहेत. त्यातच सुट्ट्यांमध्ये खासगी वाहतुकीचं भाडंही अव्वाच्या सव्वा असतं. त्यानंतर आता एसटीनेही भाडेवाढ केल्याने, प्रवाशांचा खिसा कापला जाणार आहे.