मुंबई/अंबाजोगाई : विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्‍टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.


मागील चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन मिळालेले नाही. तसेच मागील दीड वर्षापासून कायमच विद्या वेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावं लागत आहे. विशेष म्हणजे आंदोलन केले की एखाद्या महिन्याचे विद्यावेतन मिळते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे "चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोवर आम्ही हा संप मागे घेणार नाही", अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील 110 निवासी डॉक्टर सध्या संपावर आहेत. याच डॉक्टरांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे देऊन घोषणा दिल्या.

निधीअभावी विद्यावतेन रखडल्याची माहिती प्रशासनाकडून या डॉक्टरांना देण्यात आली आहे. राज्यातील अकोला, अंबाजोगाई, लातूर, नागपूर येथील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना चार महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे या डॉक्टरांनी संपाची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा देण्यासाठीसुद्धा मार्डने नकार दिला आहे.

मुंबईच्या आझाद मैदानातही राज्य आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात निदर्शने केली. वैद्यकीय सुविधांसोबत आपत्कालीन सुविधादेखील या संपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

विद्यावेतनात वाढ, वेळेवर विद्यावेतन, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा विविध मागण्या या निवासी डॉक्टरांनी मांडल्या आहेत. तर NMC बिलमध्ये सुधारणा करण्यात यावी, हीदेखील मागणी डॉक्टरांनी यावेळी मांडली आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि पुणे शहरातील पूरस्थिती पाहता तेथील डॉक्टर या संपात सहभागी झालेले नाहीत.