Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे परिसरासह नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Aug 2022 01:07 PM
कणकवली आचरा रस्ता पाण्याखाली, वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुसळधार सुरु आहे. या पावसामुळं तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवली आचरा रस्त्यावर फणसवाडी येथे रस्त्यावर गुडघाभर अधिक पाणी आले आहे. तसेच सेंट उरसुला हायस्कुल नजीक नदी पुलाच्या दुतर्फा रस्त्यावर आचरा मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळं कणकवली ते आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली गणपती साना परिसरात रस्त्यावर पाणी आलं आहे.

गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडीत नदीवर पूल नाही, पावसाळ्यात दोरीच्या सहाय्याने नागरिकांचा प्रवास

राज्यातील ग्रामीण भागात अजूनही नागरिकांना साधे रस्ते, पूल मिळालेलं नाहीत. ज्यामुळे पावसाळ्यात असंख्य गावकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी या गावातील नदीवर पूल नाही तसेच रस्ताही नसल्यानं गावकऱ्यांना पावसाळ्यात दोरीच्या सहाय्याने गावात ये-जा करावी लागत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हा जीवघेणा प्रवास असाच सुरुच आहे. गावकरी असो की शाळकरी विद्यार्थी त्यांना अशा प्रकारे ही नदी पार करावी लागत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस, निर्मला नदीला पूर आल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला

sindhudurg rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे.  यामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे.

नंदूरबार जिल्हयात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
नंदूरबार जिल्हयात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र, नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. 
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबईच्या सखल भागामध्ये काही वेळात पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबईचा अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं कही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातील नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.


सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ जावू शकतात. त्यामुळं नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत सतर्क राहावे. कारण पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.