Maharashtra Rain Update : ऐन हिवाळ्यात पावसानं हजेरी (Rain Updates) लावल्यामुळं राज्यभरात दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मुंबईतही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत पावसाची संततधार पाहायला मिळाली. याशिवाय मुंबई लगतच्या उपनगरांतही पावसानं धुमाकूळ घातला. 


राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस झालाय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला काल संध्याकाळपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावताहेत. काल संध्याकाळपासून अवकाळीनं मुंबईसह एमएमआरडीए भागात विश्रांती घेतलेली नाही. 


मुंबईत आजही पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट 


मुंबईत कालपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तसेच रात्रभरही पाऊस कोसळत होता. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.






मुंबईतील सांताक्रुज वेधशाळेत रात्री 8:30 पर्यंत 68 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विक्रोळी, सीएसएमटी, सायन परिसरात देखील ह्याच जवळपास पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सध्याची रडारची स्थिती बघता हा पाऊस रात्रभर सुरु राहणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार रात्रभर मुंबईसह उपनगरांत पाऊस कोसळत होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यातला 76 मिमी हा सर्वाधिक रेकाॅर्ड देखील तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.





ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराजा बरसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्यानं आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आलं आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे. 


30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. 


कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस 


कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यातआला आहे. ज्यात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसारख्या जिल्ह्यांनादेखील 1 आणि 2 डिसेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.


बळीराजा पुन्हा संकटात, राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी 


ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.  तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरलीए. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा