Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोर राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, लातूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार बॅटींग केली आहे. या परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.


परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, सोयाबीनसह कापूस पिकाचं नुकसान


परभणी शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसानं शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यानं येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. तर गांधी पार्क, कडबी मंडी, नांदखेडा रोड, शनी मंदिर परिसरात पाणीच पाणी झाले आहे. या पावसानं जिल्हाभरात सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी तालुक्यातील धर्मापुरी गावच्या शिवारात शेतात कामासाठी गेलेले तीनशे ते साडेतीनशे जण ओढ्याला पाणी आल्यानं अडकले होते. या सर्व लोकांना गावकऱ्यांनी ओढ्याच्या पाण्यातून दोरी लावत बाहेर काढले. 




सिंधुदुर्ग परतीच्या पावसाचा धुमाकूळ, कणकवलीत एकाचा मृत्यू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यात खारेपाटण शहरातील अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.. तसेच कासार्डे आऊटपोस्टमध्येही पाणी जाऊन नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळं भात शेतीचंही मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. परतीच्या पावसानं कणकवली तालुक्याला झोडपले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, कणकवली साळीस्ते येथील घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पांडुरंग नारायण गुरव यांचा मृत्यू झाला आहे. तहसीलदार आर. जे. पवार, मंडळ अधिकारी संतोष नागावकर तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.


अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सिना नदीला पूर


अहमदनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरासह परिसरात झालेल्या पावसानं सिना नदीला पूर आला आहे. नगर-कल्याण रोडवरील सिना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळं नगर- कल्याण महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अतिउत्साही वाहन चालक पाण्यातून वाहनं घालत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार परतीचा मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (15 ऑक्टोबर) राज्यात उघडीपीची शक्यता देखील वर्तवली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश