Chhagan Bhujbal NCP : 'मी बाळासाहेब ठाकरेंसोबत (Balasaheb Thackeray) होतो, त्यांना माता पिता मानत होतो, मी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आलो, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेब यांना सुद्धा वाटले असेल. त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपण राष्ट्रवादीत (NCP) घेतलं, त्यावेळी सुद्धा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही अश्रू आले, जसं तुम्ही वसंतदादांना सोडलं, त्यावेळी त्यांनाही असंच वाईट वाटलं असेल का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित करत शरद पवार यांना कोंडीत पकडलं. 


आज अजित पवार (Ajit Pawar) गटाची मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलेच भाषण जोरदार केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या काँग्रेस सोडण्यावर वसंतदादांची त्यावेळी झालेली अवस्था विशद केली. भुजबळ म्हणाले की, 'मी बाळासाहेब ठाकरेंसोबत होतो, त्यांना माता पिता मानत होतो, मात्र काही कारणांवरून मतभेद झाले. त्यावेळी 36 लोक तुमच्यासोबत आले, मला सुद्धा येणं भाग पडलं, तुम्ही सांगितलं नाही कि, थांबा म्हणून... त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मा साहेब यांना सुद्धा त्यावेळी असेच वाटले असेल. त्यानंतर धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना आपण राष्ट्रवादीत घेतलं, त्यावेळी सुद्धा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्या डोळ्यातही त्यावेळी अश्रू आले. या सगळ्यांची पुनरावृत्ती झाली आहे. 


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले कि, राष्ट्रवादी पक्षांत अंतर्गत बदल करण्यासंदर्भात बोलणे झाले होते, मात्र अनेकदा सांगूनही पक्षात नियुक्त्या होत नव्हत्या. अजित पवार यांनी देखील अनेक वेळा शरद पवार यांच्याशी याबाबत संवाद साधला, म्हणाले माझ्याकडे पद द्या, मी सर्व जबाबदारी पार पडतो, मात्र असं घडलं नाही, म्हणूनच हे बंड केल्याची स्पष्टोक्ती भुजबळांनी केली. शिवसेनेबरोबर गेलो, तसेच भाजपबरोबर गेलो, यात नवीन काय? आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तर सरकारमध्ये सामील झालो. नागालँड सरकारमध्ये भाजपसोबत जशी राष्ट्रवादी सामील झाली, तसेच आम्हीही केलं आहे, त्यांचा जसा सत्कार केला तसाच आमचाही सत्कार करा, असे आवाहनच, भुजबळांनी यावेळी केले. 


साहेबांच्या गुगलीत आपलाच गडी आउट


दरम्यान 1999 साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्राचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. तर शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. हळूहळू पक्ष वाढत गेला. 99 साली काँग्रेसपासून दूर झाल्यानंतर परत आम्ही काँग्रेससोबत गेलो. त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात गेले. त्यानंतरच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यानंतरच्या काळात म्हणजेच 2014 साली वेगवगेळे लढायचं कस ठरलं, त्यावेळी बीजेपीने शिवसेना सोडली, मग राष्ट्रवादीने काँग्रेस का सोडली? नंतर 2019 ला पहाटेचा शपथविधी कसा घडला? का निर्णय घेण्यात आला? त्यावेळी शरद पवार यांनी गुगली टाकल्याचे बोलले गेलं, मात्र या गुगलीत आपलाच गडी आउट झाला, हे लक्षात आले नाही. याबाबतचे कारण अजित पवार सांगतील, असेही भुजबळ म्हणाले.