Maharashtra Politics : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा एका भाजप (BJP) नेत्यानं केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे. 


नितेश राणे म्हणाले की, "मुंबईच्या व्रजमूठ सभेआधी मी सांगितलं होतं की, बिकेसीमध्ये होणारी महाविकस आघाडीची शेवटची सभा आहे. परंतु, लोकांनी मला हलक्यात घेतलं. परंतु, काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता ते भाकीत जसं खरं ठरलं तसचं आता संजय राजाराम राऊत हे 10 जून किंवा त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. तुम्ही संजय राऊत यांची भूमिका मागच्या काही दिवसातील पाहिली तर लक्षात येईल की, अजित पवार यांच्या विरोधात त्यांची भूमिका आहे. त्यांची अशी देखील मागणी आहे की, अजित पवार गेले की, मी पक्षात प्रवेश करेल."


संजय राऊत हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ देत नाहीत : नितेश राणे 


"राष्ट्रवादीला त्यांनी हे देखील कळवलं आहे की, उद्धव ठाकरे याचं आता काही खरं नाही. एबीपी माझाच्या कार्यक्रमापूर्वी संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होते. परंतु, होऊ शकला नाही, म्हणून त्यांनी सिल्व्हर ओकला जाणं पसंद केलं. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली आहेत.", असं नितेश राणे म्हणाले. पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी सर्वांनी फोन करून पवारांना विनंती केली की, तुम्ही राजीनामा देऊ नका. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचाशी संपर्क केला नाही. अशी माहिती होती की, उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते. परंतु, ते गेले नाहीत. किंबहुना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही."


कर्नाटकात जाऊन राऊतांची काँग्रेसची दलाली : नितेश राणे 


कर्नाटकमध्ये संजय राऊत भाषणं करायला गेले होते. तिथं संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्याचं काम करत आहे. तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत, तिथं काँग्रेस उमेदवार त्यांच्या विरोधात आहे आणि तरीदेखील संजय राऊत काँग्रेसची दलाली करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.