Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. शिंदे-फडणवीस सरकार. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. सरकारचा शपथविधी होऊन तब्बल 38 दिवस उलटले मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मात्र पत्ताच नाही. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. असं असलं तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडेही अद्याप कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. यावरुन विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं आरोपांचे बाण सोडले जात आहेत. अशातच आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. बंड झाले आता थंड झाले? तुमचं सर्व ओके आहे हो, पण लोकांच्या समस्येकडे कोण बघेल? असा खोचक सवाल ट्वीट करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे. 


राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असल्यानं सर्व स्तरातून टीका सुरू झाली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनीही आता सरकारला ट्विटरवरून खोचक सवाल विचारले आहेत. तुमचं सगळं ओके पण लोकांच्या समस्येकडे कोण पाहणार? असा प्रश्न राजू पाटील यानी विचारला आहे.


बंड झाले, आता थंड झाले? : राजू पाटील


शिंदे फडणवीस सरकारला महिनाभराचा कालावधी उलटला, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यानं विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष केलं आहे. त्या पाठोपाठ सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील सरकारला ट्वीट करत जाब विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल? असा सवालही ट्विटरवर ट्वीट करून राजू पाटील यांनी विचारला आहे. सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदारांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. 


मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात?


आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात  मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.