Maharashtra Politics : शिवसेनेतील (Shivsena) 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती समजत आहे. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे विनायक राऊत (Vinayak Raut) हेच गटनेते आणि राजन विचारे (Rajan Vichare) हे अधिकृत व्हीप असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत. 


शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक काल ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.


लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार


विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित 12 खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून शिवसेनेच्या लोकसभेतील बारा खासदारांना घेऊन ते पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.


''मूळ शिवसेना आमचीच"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.  शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.