Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha Live Updates: राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे; नाना पटोले यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र

Maha Vikas Aghadi Vajramuth Jahir Sabha: महाविकास आघाडीची वज्रमूठ जाहीर सभा लाईव्ह अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2023 08:53 PM
भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरु; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, राज्य सरकार, तसेच पीएम मोदी यांच्यावर तोफ डागली. भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. लोकशाही म्हणजे दहीहंडी आहे का? दिसली की फोडा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. अदानी मुद्यावरूनही त्यांनी भाजपला इतके का हादरला? अशी विचारणा केली. 

भाजपच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची तोफ धडाडलीच नाही! 

Nagpur Mahavikas Aghadi Vajramooth Sabha: महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज भाजपच्या बालेकिल्ल्यात पार पडली. या सभेकडे उद्धव ठाकरे काय बोलणार? यापेक्षा अजितदादा काय बोलणार याकडे सर्वाधिक लक्ष लागून होते. मात्र, नागपुरात सभेतील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची तोफ धडाडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वज्रमूठ सभेत विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आमदार अनिल देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केले. 

राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे; नाना पटोले यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र

राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. त्यांच्या विनोदावर विरोधी पक्षनेते अजित पवार हसतात, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. 

Maha Vikas Aghadi: नागपूरमध्येच विकास होत नसेल तर महाराष्ट्रात काय होणार? जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा

Maha Vikas Aghadi:  नागपूरमध्येच विकास होत नसेल तर महाराष्ट्रात काय होणार, असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. 

नागपूरच्या वज्रमूठच्या सभेतून पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांचा भाजपला टोला 

पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना अदानी मुद्दा उपस्थित करत पीएम मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यानी सांगितले. ते कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. विस्फोटक बातम्या येत आहेत, अदानी समूहाकडून सांगूनही हिंडेनबर्गवर मानहानीचा दावा ठोकला नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नागपूरचा संदेश देशात जातो. विदर्भाने इंदिरा गांधींना सुद्धा पाठिंबा दिला होता. 10 महिन्यात काय दिवे लावले? असा जनतेचा सवाल असल्याचे ते म्हणाले. विदर्भात कोणते प्रकल्प आणले? अशी विचारणा त्यांनी केली. 

माझ्यावरील 100 कोटींचा आरोप खोटा : अनिल देशमुख 

आमदार अनिल देशमुख यांनी संभाजीनगरची विराट सभा पाहून पायाखालची वाळू सरकल्याने नागपुरातील सभेला विरोध झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. राज्यात अवकाळी होऊनही शेतकऱ्यांना मदत नसल्याचे त्यांनी सांगितले.  पिकांचे नुकसान होऊनही मदत झाली नसल्याचे ते म्हणाले. राज्यात उद्योगधंदे येत नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावरील 100 कोटींचा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले. 14 महिने जेलचा भत्ता खाऊन बाहेर आलो असल्याचेही ते म्हणाले. 

सुनील केदारांकडून नेत्यांचे स्वागत

नागपूरमधील सभेची जबाबदारी घेतलेल्या सुनील केदार यांनी व्यासपीठावरील नेत्यांचे स्वागत केले. 

सभेसाठी महाविकास आघाडीमधील कोणत्या नेत्यांची उपस्थिती?

नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित आहेत. 

उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचले 

सभास्थळी उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवलेले उद्धव ठाकरे नागपुरातील सभेत काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष आहे. 

हे सरकार ईडीच्या भरोश्यावर; आमदार नितीन देशमुखांचा हल्लाबोल 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी वज्रमूठ सभेत बोलताना शिंदे गटावर हल्लाबोल केला. हे सरकार कसं आलं मला माहीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. 

नागपूरच्या सभेत खूर्च्यांचा वाद टाळला! 

महाविकास आघाडीच्या छत्रपती  संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे विशेष खूर्ची होती. त्यामुळे बरीच राजकीय चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या सभेला नागपुरात सर्व खूर्च्या सारख्याच ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या रांगेत मोठे असतील. दुसऱ्या रांगेत तिन्ही पक्षातील इतर नेत्यांसाठी सोय करण्यात आली आहे. 

नागपूर वज्रमूठ सभा : अजित पवार बोलणार की नाही? याची उत्सुकता शिगेला 

नागपूरमध्ये होत असलेल्या वज्रमूठ सभेत कोण कोण बोलणार याचीही उत्सुकता आहे. या सभेत  उद्धव ठाकरे संबोधित करतील. तसेच गुवाहाटीमधून परत आलेले आमदार नितीन देशमुख बोलतील. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, जयंत पाटील हे बोलणार निश्चित असले, तरी अजित पवार बोलणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसकडून सभेची जबाबदारी घेतलेले सुनील केदार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतील. 

नागपूर वज्रमूठ सभा : उद्धव ठाकरे सभेसाठी रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  भाजप-आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे सभेसाठी हाॅटेलमधून रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत. 

पार्श्वभूमी

Maha Vikas Aghadi Vajramuth Jahir Sabha:  महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत. अजित पवार हे भाषण करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन नेते संबोधित करणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी मिळणार की राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना भाषणाची संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर आता महाविकास आघाडीची ही दुसरी वज्रमूठ सभा आहे.


भाजप अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगरमधील मैदानावर ही सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवलेले उद्धव ठाकरे नागपुरातील सभेत काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष असले, तरी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अजितदादा पवार यांच्या भाषणाकडे सर्वाधिक लक्ष आहे. गेल्या काही  दिवसांपासून दादा भाजपकडे झुकल्याचे चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम देणार की? पुन्हा चर्चेचा वाट मोकळी करून देणार? याकडे लक्ष आहे. तसेच अदानी आणि मोदींच्या डिग्रीच्या मुद्यावरूनही महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत. सावरकर मुद्यावरून गोंधळ दिसून आला होता. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे वज्रमूठमधून मिळणार का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 


महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी  पोलिसांकडून या सभेच्या परवानगीवरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. मैदानाची मालकी असलेल्या NIT ने त्यांना मैदानाच्या मालकीची परवानगी दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलीस परवानगी दिली आहे.  


काय आहेत अटी आणि  शर्ती?



  • सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात यावे

  • सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे

  • कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये.

  • सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये.

  •  क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

  • सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत  सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.