Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मंत्री करायला नको होते. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होते असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केलं आहे. दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाली असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंनाच घरचा आहेर दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


Sanjay Jadhav on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवा होता


महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला. एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही याचे दु:ख होते असेही संजय जाधव म्हणाले. ही वस्तुस्थिती आहे, मी केवळ त्यावर बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला होता तो दिला नाही म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावल्याचे जाधव म्हणाले. यामुळेच चोरांना संधी मिळाली असा टोलाही संजय जाधव यांनी शिंदे गटाला लगावला. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते. आदित्य ठाकरेंना मंत्री करायचे होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायला नको होते, असेही संजय जाधव म्हणाले.


दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाली


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाली. बाप गेला की पोरगा आपल्यासमोर उभा राहील याच भावनेतून मी माझी वेगळी चूल पेटवली तर मग काय बिघडेल, याच भावनेतून ही गद्दारी झाल्याचे संजय जाधव म्हणाले.


आठ महिन्यापूर्वी झाला होता राजकीय भूकंप 


आठ महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी देखील खंत व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांणा उधाण आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


निवडणूक आयोगावरुन आमचा विश्वास उडाला, तो चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका