Gulabrao Patil : राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसचे (Congress) आमदारही फुटणार असल्याचा खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. ते कुणाकडे येतील ते सांगता येणार नाही असंही ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 


अजित पवार भाजपसोबत येतील याबाबत कुठलीही माहिती नव्हती


काँग्रेसचेही आमदार तयारीत आहेत, सांगता येत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. कुणाकडे येतील ते सांगता येणार नाही, पण येतील. ते येतील हे मी निश्चितपणाने ऐकलं आहे, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का? यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणालाच कल्पना नव्हती. मात्र, दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. ते येतील याबाबत मला कुठलीही माहिती नव्हती, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.


काँगेस आमदारांबरोबर चर्चा झाली नाही


गेल्यावेळी मी नगर येथील सभेत सांगितलं होत की, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्याकडे येतील ते आले, असे पाटील म्हणाले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. याबाबत काँगेस आमदारांची काही चर्चा झाली आहे का? असं विचारलं असता, काहीच चर्चा झाली नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.


दाल में कुछ काला है, त्यामुळेच लोक पक्षांतर करतायेत 


शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही केलेला उठावासंदर्भात लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले. आता नीलम ताई यांनी पक्षात प्रवेश करण्याची गरज नव्हती. मात्र, काही ना काही गडबड है, दाल में कुछ काला है, त्याच्यामुळेच लोक पक्षांतर करत आहेत. ठाकरे गटाचे आणखी कुणी शिंदे गटात येतील का? यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या आपण पाहतोय की काय चाललयं.  ज्या गोष्टी लोकांच्या डोक्यात नाहीत, त्या होत आहेत. त्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही की उद्या काय होईल असही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: