Sanjay Raut : महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.


राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्वच राज्याचं लक्ष लागलं आहे.


 






झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद 


अशातच आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत. तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांनी या 16 आमदारांना आपत्रतेची नोटिस पाठवली होती. कालपासून ते माध्यमांसमोर येण्यास टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की, ते त्यांच्या गावी असणार आहेत. पण ते त्यांच्या गावी नसल्यामुळे आणि त्यांचे दोन्ही फोन बंद असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.


विधानपरिषद निवडणुकीनंतर घडलं राजकीय नाट्य


महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर 20 जून 2022 रोजी जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : जोपर्यंत त्यांच्याकडे 145 चा आकडा तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही : अजित पवार