Maharashtra Political Crisis: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत 45 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत ते त्यांची साथ सोडून हळूहळू शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. अशातच शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात त्यांना यश येताना दिसत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांना पुन्हा परतण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता. मात्र बंडखोर आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यातच आता बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी स्वतः शिवसेना कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.  


आमदारांना परत आणण्यासाठी कार्यकर्ताने साताऱ्याहून थेट गुवाहाटी गाठले


एकनाथ शिंदे यांनी या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये ठेवले आहे. या आमदारांनी पुन्हा शिवसेनेत परतावे म्हणून एका शिवसैनिकाने साताऱ्याहून थेट गुवाहाटी गाठले आहे. संजय भोसले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. संजय भोसले हे शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आहेत. भोसले हे एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील मूळ गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा मुंबईत परतण्याचं आवाहन करण्यासाठी भोसले गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमबाहेर पोहोचले होते. ते आपल्यासोबत एक पोस्टर ही घेऊन गेले होते. ज्यावर लिहिलं होत की, ''शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला.'' मात्र ते बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन करतील त्याआधी त्यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे.


   



मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्याकडे 15 हूनही कमी आमदारांचे पाठबळ राहिल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान, आज शिवसेनेने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला 250 हून अधिक पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही.'' शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना ठाकरे म्हणाले, ''स्वतःच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करू नये का?''