सिंधुदुर्ग : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाकडून सील केले जातील, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.


प्रथेप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी आंगणे कुटुंबीयांनी यावर्षीची भराडी देवीच्या जत्रेची 6 मार्च ही तारीख जाहीर केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत होऊन मंदिरातील धार्मिक विधी पार पडतील. तसंच भाविकांना यात्रेत प्रवेश नसल्याचं आंगणे कुटुंबियांनी स्पष्ट केलं होत. प्रशासनानेही आंगणे कुटुंबीय सोडून अन्य भाविकांना यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले होते.


दरम्यान राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीय मर्यादित होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेत आंगणे कुटुंबीय यांचीही एकाच वेळी गर्दी होऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मंडळ यांची यात्रा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या.


दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, आंगणे कुटुंबीयांनाच यात्रा कालावधीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.


मंदिराकडे येणाऱ्या मालवण, मसुरे आणि कणकवली अशा तिन्ही मार्गावर बॅरिकेट्स लावून पोलीस प्रशासन मार्ग सील करणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत आणि मंदिरात प्रवेश नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी सूचनाही प्रशासनाला देण्यात आली आहे.


आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.