Jalgaon Gulabrao Patil : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर घडवून आणले. मात्र त्यांच्यासोबत मी पार शेवटी गेलो. राज्यातील अनेक भागातील आमदार शिंदे सोबत गेले. जळगावचे आमदारही गेले, मात्र तोपर्यंत मी निर्णय घेतलेला नव्हता. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं? असा सवाल करत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा सत्तातरांच्या वेळचा घटनाक्रम अधोरेखित केला. 


केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील साळवे गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सत्तांतर होण्याच्या आगोदर माझ्या मनात नेमकं काय चाललं होत? हा निर्णय घेण्यामागचं कारण त्यांनी त्यांनी उलगडून दाखवलं. ते म्हणाले की, सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. मात्र या सगळ्या सत्तातरांच्या काळात मी तर 32 नंबरला गेलो. माझ्या आधी 31 जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यात पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले होते, असे पाटील म्हणाले. 


गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत अनेकजण जात होते. सुरवातीला नागपूरचाही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले, नाशिकचे (Nashik) गेले, दादर, ठाण्याचे सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? सर्वच शिंदेंसोबत पळून गले. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग मी देखील निर्णय घेत एकनाथ शिंदेंसोबत गेलो. मग माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशा टीका होत गेल्या. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे. तो महाराष्ट्राचा झाला नसता. त्यामुळे मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. 


मंत्रीपद मला सहज मिळालं नाही


गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही, माझ्या राजकीय आयुष्यात 15 ते 20 वेळा जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य संघर्षात घातलं. त्यावेळेस सत्तेची लालसा केली नाही, मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. मात्र एकनाथ शिंदेंसोबत जाऊन एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी सट्टा खेळलो, भगवा झेंडा वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोबत गेलो. आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षासोबत गेलेलो नाही. अजूनही शिवसेनेसोबतच आहोत. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.