Devendra fadnavis vs Ajit pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा बारामतीवरुन पवारांवर निशाणा साधलाय. पण यावेळेस परिणाम मोठे आणि दुरगामी असणार आहेत. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागणीवरून निरा देवधरसाठी एकाच वेळी 100 कोटी दिलेत. सांगली कोल्हापूरच्या पुराचं पाणी आणले जाणार आहे. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी देण्यासाठी 14 हजार कोटी रूपयांची तरतूद केली होतीच. यापैकी एका प्रकल्पाच्या शुभारंभावेळी फडणवीस म्हणाले की, 'मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडले होते, ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचे काम आम्ही करत आहोत.' फडणवसांच्या या आरोपाला अजित पवार यांनाही सडेतोड उत्तर दिलेय.


अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर -
बारामतीत कुठलेही पाणी अडकले अथवा अडवले नाही, देवेंद्र फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी. पाणी कुठेही अडले नाही बोगद्याचे काम सुरू आहे. फक्त बारामती नाव घेतले तर ब्रेकिंग होते म्हणून हे सुरू आहे, असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 


देवेंद्र फडणणीवस धाराशिवमध्ये -


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे विकास तीर्थ कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. पांगदरवाडी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांचा सत्कार केला. या प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेतील कामे जून 2024 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी यंत्र पूजन केले. ज्याला पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पाण्यावरचे प्रेम कळते त्यांना ही पुजा का महत्त्वाची आहे ते कळेल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याचा जेवढा भाग येतो, त्याबदल्यात 65 टिएमसी पाणी देणे अपेक्षित होते. विलासराव देशमूख मुख्यमंत्री असताना 27 टीएमसी पाण्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात 7 टीएमसी पाणी देण्यासाठी काम सूरू आहे.


नेमकं प्रकरण काय ? 


महाराष्ट्रातलं राजकारण पाण्याभोवती फिरते. सह्याद्रीतून उगम पावणार्या नद्या ऊसाला पाणी पाजतात. त्यातून साखर कारखानदारी…कारखान्यातून राजकारण चालते… 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार आलं त्यावेळेला 43 अपक्ष आमदार निवडून आले होते. पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी स्वतःसाठी मंत्रिपद न मागता कृष्णा खोरे विकास महामंडळाची मागणी केली. त्यासाठी भरघोस निधीची तरतूद करवून घेतली. पाणी अडवलं गेलं आणि अनेक जणांचं राजकीय कारकीर्द या पाण्यामुळे घडली. अशा वेळेलाच अजित पवार, रामराजे निंबाळकर आणि माढ्याच्या भाजपा खासदारादरम्यान नीरा देवधर वरून वाद सूरू आहे. त्या निरा देवधरसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने शंभर कोटी रुपये दिलेत.  


महाविकास आघाडीच्या काळात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आहे. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकरांनी बारामतीकरांनी इतरांना पाणी मिळू दिले नाही. निधी दिला नाही असा सतत  आरोप केला आहे. कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी जून 2024 पर्यंत मराठवाड्यात पोंहचवण्याचा प्रयत्न सूरू झाला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण करून सांगली आणि कोल्हापूरला वेढा घालणारे पुराचे पाणी उजनीमध्ये आणण्याचे काम होणार आहे. पुराचे पाणी मराठवाड्याला, सोलापूर जिल्ह्याला देण्याचा विचार हेच मोठे राजकारण आहे…टार्गेटवर बारामती आहे.