मुंबई : पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजूनही सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे आणि गौप्यस्फोट केलेत. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव होता, असा मोठा दावा फडणवीसांनी केलाय. एवढंच नव्हे तर 'भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण 'शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा दावा फडणवीसांनी केलाय. शिवाय सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून पाठीत खंजीर खुपसल्याचाही आरोप केलाय.


शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवर माघार घेतली 


फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेलं नातं तोडले. त्यानंतर आम्ही सरकारी स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करत होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना पुढाकर देण्यात आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे मी आणि अजित पवार  यांनी सर्व तयारी केली. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली. 


शरद पवारांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला


शरद पवार यांनी  पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्न  विचारला  असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केली ती दगाबाजी होती. त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. शरद पवार  आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली एकप्रकारे आमचा डबलगेम केला. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


शरद पवारांना विश्वासात घेऊनच शपथविधी 


शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला,  असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.


पहाटेचा शपथविधी आणि राज्यात खळबळ


23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन  शपथ घेतली होती. परंतु अल्पवधीतच सरकार कोसळलं. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं बोलून दाखवलं होतं.