Chhatrapati Sambhaji Nagar Water Issue : छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या सतत फुटत असतात. तर अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. दरम्यान उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा (Water Issue) सामना करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आता या दोन्ही जलवाहिनीवरील पाणी गळती थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी खास पाणबुडे बोलावण्यात आले. तर शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या पाणबुडीच्या मदतीने 700 मिमीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. तर रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते, ज्यात 20 पेक्षा अधिक गळती थांबविण्यात मनपाला यश आले आहे. 


जुन्या शहराला 700 मिमी आणि 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्या असून, सतत फुटत असतात. जलवाहिन्या फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा देखील सतत विस्कळीत होत असतो. तर अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना तडे गेले असून, त्यातून पाणी गळती होत असते. त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.  परंतु जलवाहिनीला गळती लागलेल्या ठिकाणी जलवाहिनीवर सिंमेटचे रस्ते बनवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता न खोदता पाणबुड्यांच्या मदतीने गळती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई येथून पाणबुडे विष्णू शिवतारे व त्याचे सहकारी यांना बोलवण्यात आले आहे. तर शनिवारी दुपारी या पाणबुड्यांच्या साह्याने जलवाहिनीतील गळतींचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन पाणबुड्यांनी गळतीचा शोध घेत दुरुस्ती सुरू केली आहे. 


उन्हाळा लागताच शहरात पाणी टंचाई? 


छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जुन्या झाल्या आहेत. त्यातच वाढती लोकसंख्यामुळे पाण्याची मागणी देखील कितीतरी पटाने वाढली आहे. त्यामुळे उन्हाळा लागताच शहरातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवत असते. अनेक भागात दहा-दहा दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पाणी प्रश्न कायम आहे. अनेकदा नवनवीन योजना जाहीर करण्यात आल्या, मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाही. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न कायम आहे. 


राजकीय नेत्यांचं अपयश...


राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे सुरुवातीपासूनच एक वेगळे महत्व राहिले आहेत. या शहरातील अनेक लोकप्रतिनिधी राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत मंत्री राहिले आहे. एवढच नाही तर सध्या केंद्रात दोन आणि राज्यातील सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन असे एकूण पाच मंत्री आहेत. मात्र असे असताना देखील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे शहरात निर्माण झालेला पाणी प्रश्न राजकीय नेत्यांचं अपयश म्हणाले लागेल. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश