Aurangabad Water Issues: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसताना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत हा पाणी प्रश्न जाऊन पोहचला आहे. एवढच नाही तर औरंगाबादचा पाणी प्रश्न मोदीच सोडवणार असून, 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारचे कान टोचले आहे. त्यांनतर आता यावरून शिवसेने सुद्धा उत्तर देत, राज्यपालांनी एखाद्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मांडणं म्हणजे आजानतेपणाचे लक्षण असल्याच म्हटले आहे. 


काय म्हणाले राज्यपाल... 


राजभवन इमारतीच्या बंकरमध्ये 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे तसेच जलभूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, औरंगाबादला गेलो होतो, एक दिवस राहिलो. तेथील लोकं येऊन मला भेटले आणि शहरात सात दिवसांनी, पाच दिवसांनी पाणी येत असल्याचे म्हणाले. त्यामुळे पंतप्रधानांनी यात लक्ष घालावे. ‘मोदी है तो मुमकिन है’, म्हणूनच हा प्रश्न नक्की मार्गी लागेल असा मला विश्वास आहे,’ असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले. 


शिवसेनेचं उत्तर... 


या सर्व प्रकरणावर आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे, राज्यपालांनी एखाद्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मांडणं म्हणजे आजानतेपणाचे लक्षण असल्याच दानवे यांनी म्हटले आहे. तर औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्नावर कुणीही बोलते.मात्र मुख्यमंत्री यांनी लक्ष घातल्यानंतर शहराच्या पाणीप्रश्नावर कमालीचा बदल घडून आला आहे. म्हणूनच औरंगाबादकर समाधानी होत आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नाबरोबरच वाढत्या महागाईवर सुद्धा बोलावे असा टोला दानवे यांनी यावेळी लगावला. 


औरंगाबादकरांना ‘शक्कर बावडी’तून पाणीपुरवठा


औरंगाबाद शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता हिमायत बागेतील ऐतिहासिक शक्कर बावडीच्या पाण्यातून दिल्ली गेट, रोजाबाग आणि परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. या बावडीतून लवकरच पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देण्यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आता पर्यंत 20 बाय 80 मीटरच्या या बावडीतून अंदाजे 150 ब्रास गाळ उपसण्यात आला आहे. गाळ उपसण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आगामी चार दिवसात संपूर्ण गाळ उपसून बावडीचे पाणी रोझाबाग सेटलिंग टँकमध्ये पोहोचवल्या जाईल. त्याठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण, गुणवत्ता तपासून नागरिकांना लवकरच या बावडीतून पाणी देण्यात येणार आहे, असं चव्हाण यांनी पाहणीदरम्यान सांगितले.