Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट, धुळीचा कहर; वाचा महत्वाचं अपडेट्स

Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान कमालीचं घटलं आहे. वाचा महत्वाचं अपडेट्स

abp majha web team Last Updated: 25 Jan 2022 09:54 AM
पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट

पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालन्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे. 

परभणीचे तापमान 8.6 अंशावर, थंडीने परभणीकर गारठले

मागच्या अनेक दिवसांनंतर परभणीच्या तापमानात मोठी घट झाली असुन जिल्ह्याचे तापमान हे 8.6 अंशावर आले आहे यामुळे परभणीकर थंडीने चांगलेच गारठून गेले आहेत. हवेत गारवा वाढल्याने सर्वत्र थंडीचा कडाका वाढलाय. पुन्हा एकदा जिल्ह्यात शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे या थंडीचा फायदा गहू आणि हरभरा पिकाला 
होत आहे.

बुलढाण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

बुलढाणा जिल्ह्यात आज 9.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे वर्षात सर्वात कमी तापमान आहे.

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला

रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. माथेरान येथे आज 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी 7.6 अंश तापमानाची नोंद झाली होती.

पार्श्वभूमी

Maharashtra Cold Weather : महाराष्ट्रात गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी हवेत गारवा राहिल्याने तापमानात घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. धुळे जिल्ह्यात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतही मोसमातील निच्चांकी 14 अंश तापमानाची नोंद झाली आहे.


सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. वेण्णालेक परिसरात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 6.5 अंशावर पोहोचला आहे. वाईमध्ये 9 अंश तर, साताऱ्यामध्ये 11.3 अशं तापमान आहे. नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलं आहे. या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देत आहेत. तर, पुण्यामध्येही 9.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 


परभणी जिल्ह्याचे तापमानही घसरले आहे. परभणी जिल्ह्याचे तापमान 8.6 अंशावर असून सर्वत्र थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली नोंद झाली आहे. सपाटी भागात तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुर्गम डोंगराळ भागात सपाटी भागापेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.