ठाणे : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स 30 एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याच्या  निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला अनुसरून ठाणे महापालिकेनेही 144 कलम लागु केले आहे. 


त्यानुसार, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध आहे.या  काळात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यत संचारबंदी लागू असून विकेंडला म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यत पूर्णतः बंद असेल. 


शाळा- महाविद्यालये बंद, धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद असली तरी, 10 वी 12 वीच्या परिक्षार्थी व कर्मचाऱ्यांना मुभा राहील. या नियमावलीत रस्त्यावरील खाऊ गल्ल्या सुरू राहणार असून केवळ पार्सल सेवेला परवानगी आहे. मात्र, पालिकेच्या संभ्रमांच्या या निर्णयामुळे कारखानदार व उपहारगृह व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कारखानदारांना उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी देताना कामगारांची कोरोना चाचणी करणे, लसीकरण करणे अशा अटी घातल्या आहेत. मात्र, नियमानुसार सध्या 45 वर्षांपुढील व्यक्तिंचे लसीकरण केले जात आहे. 


त्यामुळे सर्व कामगारांचे लसीकरण करावे की 45 वर्षांपुढील कामगारांचे, शनिवारी आणि रविवारी संचारबंदी असल्यास कारखाना सुरू ठेवावा की नाही याबाबात नियमावलीत सुस्पष्टता नसल्याचे सुर उमटत आहेत. तर, 10 वी, 12 वी साठी वापरले जाणारे सर्व कर्मचारी/शिक्षकांनी लसीकरण करून घ्यावे किंवा कोविड निगेटीव्ह (48 तासांपर्यत) प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.


महत्वाच्या बातम्या :