Uddhav Thackeray : महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठणावरून वाद सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दादागिरी कशी मोडायची हे शिकवले आहे, असे ते म्हणाले. तसेच "मला लवकरात लवकर जाहीर सभा आयोजित करायची आहे. मला या बनावट हिंदुत्ववाद्यांशी बोलायचे आहे. मी लवकरच बैठक घेईन, मी त्यांचा मुखवटा उतरवणार आहे. हनुमान चालिसाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी काल संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?


आमचं गदाधारी हिंदुत्व आहे, विरोधकांवर साधला निशाणा 


यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..'' 


"हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर फोन करून घरी या...पण..."


उद्धव ठाकरे म्हणाले, हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर फोन करून घरी या. पण तुम्ही 'दादागिरी'चा अवलंब केलात तर ती कशी मोडायची ते आम्हाला माहीत आहे. ते म्हणाले की हनुमान चालीसाचे पठण करण्याची पद्धत आहे. काही लोकांना काम नाही. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि नंतर त्यात देशद्रोहाचा आरोपही जोडला होता. रविवारी मुंबई न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर रविवारी रात्री उशिरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले.


राणा दाम्पत्याच्या जामीनावर सुनावणी


राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राणा दांपत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयपीसी कलम 124 A मध्ये दंडाधिकारी कोर्टाला जामीनाचे अधिकारच नसल्यानं तो मंगळवार सकाळपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात पहिल्याच सत्रात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. 


तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड


मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.