मुंबई : राज्यातील 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. अवघ्या 4 दिवसांत 137 कोटी 61 लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, तशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, लॉकडाऊन काळात नुकसान भरपाई म्हणून बांधकाम मजुरांना दीड हजाराची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. 


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीकृत असणाऱ्या 13 लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील 13 लाखांपैकी 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या 4 दिवसांत 137 कोटी 61 लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा करण्यात आल्यानं कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.  


या निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळणत असून महाराष्ट्र इमारत आणि  इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांमार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादूर्भावात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.


सध्या राज्यात 1  मे 2021 पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत आणि इतर बांधकामं तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरु झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदणीकृत कामगारांना दीड हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु होत असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.


नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत 2 लक्ष 3 हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदणीकृत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह आणि रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये असं आवाहनही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.