Maharashtra Lockdown E-pass  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. 


अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे. 


Maharashtra Lockdown : राज्यभरात कडक लॉकडाऊनला सुरुवात, ठिकठिकाणी प्रशासन सज्ज...


गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. 1 मे पर्यंतच हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे. 


ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? 


- ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. 


- ज्यानंतर इथं 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करावं. 


- पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा. 


- आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत. 


- प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं. 


- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा. 


- अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल. 


- पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता. 


- या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल. 


- प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो. 


ई- पाससंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे 


- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.


- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही. 


- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो. 


- ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांची मदत केली जाईल.