Maharashtra Gujarat Border Dispute : महाराष्ट आणि कर्नाटक राज्याच्या सीमाभागाचा प्रश्न अदयाप प्रलंबित आहे. त्यातच आता गुजरातनेही महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरवात केल्याचे समोर आलेय. गुजरात राज्याच्या गावाने महाराष्ट्रातील गावात अतिक्रमण केलेय, असा आरोप डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केला. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढील आठवड्यात हा वाद सोडवण्याचे आश्वासन दिलेय. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधलाय. 


नेमका वाद काय? काय म्हणाले आमदार विनोद निकोले ?


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमावादाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सुरु झाला आहे. गुजरात राज्यातील उमरगाव तालुका आणि महाराष्ट्रातील डहाणू आणि तलासरी तालुका या सीमेवर वाद निर्माण झाला आहे. वेवजी, गिरगाव, घिमानिया, झाई, सांभा आणि आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. गुजरात राज्यातील उमरगाव तालुक्यातील गोवाडे, सूलसुंभा, सध्या, उमरगाव तालुक्यातील सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायतमध्ये जवळ जवळ 500 मीटर जागेवर अतिक्रमण केले आहे अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.


मागील वर्षी गुजरातमधील गोवाडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील झाई गावातील काही लोकांना नोटीस बजावली होती.गुजरात आणि गोवाडे गावात तुमची घरे असल्याची नोटीस गोवाडे ग्रामपंचायतीने झाई गावातील लोकांना पाठवली होती. वेवजी ग्रामपंचायतीचा सर्वे नंबर 204 चा फेरफार 104 असा पडला आहे. ही जागा जवळपास पाच एकर 30 गुंठे इतकी आहे. ही जागा गुजरातच्या सूलसुंभा गावाच्या हद्दीत येते. पण हा सातबारा महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीचा आहे. वेळोवेळी आपल्या ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस बजावली आहे.  ही जागा आमच्या हद्दीमध्ये आहे, तुम्ही अतिक्रमण केलेय. 


हा वाद वाढत चालला आहे. दोन आठवड्यापूर्वी येथील नागरिक माझ्याकडे आले होते. त्यांनी तेथील वस्थूस्थिती सांगितली. दोन राज्यांच्या ग्रामपंचायतीचा वाद वाढत चालल्याचे त्यांनी सांगितले. येथे राहणारा समाज मोठ्या प्रमाणात अदिवासी आहे. हा वाद लवकरात लवकर मिटवावा, असे लक्षवेधी विनोद निकोले यांनी मांडले. गुजरात राज्याने कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. गुजरातने तयार केलेला रेल्वे ब्रिजही महाराष्ट्रातील गावात आलेला आहे. लवकरात लवकर सीमावादाचा मुद्दा सोडवावा अशी विनंती आहे. 



राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ?


महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई येथील स्थानिक प्रश्नांसोबतच वेवजी (ता. तलासरी) व सोलसुंभा (जि. बलसाड) यांच्या सीमाहद्दी निश्चितीसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.  






जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - 


महाराष्ट्र राज्यातील एका गावामध्ये गुजरात राज्याने अतिक्रमण करणं हे बघायला गेलं तर खुप लहान प्रकरण आहे. पण भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे प्रकरण खुप मोठं आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा हा अपमान आहे. एक इंचही जमीन सोडणं म्हणजे 105 हुतातम्यांच होतात्म्य विसरण्यासारखं आहे. अनेकांनी हा प्रश्न हसण्यावरी नेला. पण आजचा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राच्या सीमा रक्तानी माखलेल्या आहेत. ते रक्त इथल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या अनेक लढवय्यांचे आहे. आज जेव्हा गुजरातला एक इंच जमीन जाते तेव्हा त्या लढवय्यांच्या रक्ताचा अपमान होतो हे लक्षात ठेवा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलेय. 






आणखी वाचा :


Border dispute | महाराष्ट्र गुजरातमधील सीमावाद पुन्हा उफाळला, राज्याच्या हद्दीत गुजरातचं अतिक्रमण