Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आता लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाऊन कसा असेल? काय सुरु, काय बंद असेल?  असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात निर्माण झाले असतील. यंदाच्या लॉकडाऊनची दाहकता कमी ठेवण्यावर सरकारचा भर असणार आहे.  गेल्या लॉकडाऊनमध्ये राहिलेल्या उणिवा भरून काढण्यावर सरकारचा भर आहे. कोरोनामुळे होणारी जीवितनहानी टाळण्यासाठी लॉकडाऊन गरजेचाच असल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमवेत झालेल्या बैठकांमघ्ये काढण्यात आला आहे. यंदाच्या लॉकडाऊनचं चित्र कसं असेल एक नजर टाकूया...


लॉकडाऊनची पूर्व तयारी काय?


जिल्ह्याजिल्ह्यात बेड्स वाढणार 
सध्या व्हेंटिलेटर, ॲाक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नाहीत 
महाराष्ट्रात जिल्हानिहाय हे बेड्सचं वाढवले जातील 
तर मुंबईत वॉर्ड्सप्रमाणे बेड्स आणि आयसीयू बेड्स पुढच्या दोन ते तीन दिवसांत वाढवले जाऊ शकतात 
मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणत: हजार बेड्स
जम्बो कोव्हिड सेंटर सुरु ठेवण्यावर भर आहे 
लॉकडाऊनमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊन आरोग्य सेवेवरचा ताण कमी करून जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर भर असेल .
सध्या 20 हजार 250 आयसीयू बेड्स पैकी 75 टक्के भरले असून 67 हजार ऑक्सिजन बेड्स पैकी 40 टक्के भरले आहेत. जवळपास 11 ते 12 जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. या पुढच्या आठवड्यात वाढवल्या जातील एवढच नव्हे तर नंदुरबार येथील रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली जातेय असं टप्प्या टप्यात सर्वत्र होईल.


दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय


सीमा बंद होणार, पोलिस तैनात!


राज्यात जिल्हा पातळीवरच्या सीमा पुन्हा एकदा बंद केल्या जाण्याच्या शक्यता आहे. ज्यांना गावाला किंवा दुसऱ्या शहरात अतिमहत्वाच्या कामा व्यतिरिक्त जाता येणार नाहीय. जर दुसऱ्या भागात जायचं असेल तर पुन्हा एकदा पोलिसांची परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, उपनगर आणि इतर आसपासच्या शहरांच्या वेशीवर पोलीस दिवसरात्र तैनात करण्यात येऊ शकतात. भाजीपाला, दुध, फळं, आरोग्य सेवकांच्या वाहनांना परवानगी असणार त्याव्यतिरक्त सापडल्यास कारवाई होऊ शकते


लसीकरणासाठी घरपोच सेवा 


एकीकडे लॉकडाऊन होत असताना विविध पालिकांचे कर्मचारी दिवस रात्र काम करणार आहेत, त्यामध्ये पालिकेच्या रुग्णालयात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर सरकारचा भर असेल, नागरिकांना घरातून ते रुग्णालयापर्यंत घेऊन जावून लस देऊन पुन्हा घरी सोडण्याचा विचार सरकार करतंय.


अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक :- 


रेल्वे, बस, एसटीचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी करू शकतील, त्याव्यतिरिक्त रस्त्यावर कोणालाही फिरता येणार नाही. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि पालिका कर्मचारी, राज्यातल्या विविध भागात तैनात करण्यात येणार आहेत.   


वाईन शॉप्स, किराणा माल आणि भाजीपाला सुरु राहणार 
घरपोच मद्य सेवा सुरु ठेवण्यात येईल. तसेच किराणा आणि भाजीपाला कोरोनाच्या नियमाचं पालन करून सुरु ठेवण्यात येईल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा भार हलका होण्यास मदत होईल मद्य विक्रीतून राज्याला मिळणारं उत्पन्न मोठं आहे. त्यामुळं मागच्या लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप्स बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता तो यंदा घेणार नाही अशी शक्यता आहे. 


विमान सेवा सुरूच राहणार 


विदेशातून आणि इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणी अनिवार्य असेल. तसेच 7 ते 14 दिवासांचा क्वारंटाईन कालावधी कायम राहिल. तसेच इतर राज्यात किंवा परदेशात जायचं असेल तर इकडून सुद्धा चाचणी करूनच जावं लागण्याची शक्यता आहे.


कोरोनाचे 95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी असं मत टास्क फोर्सनं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. पण सरकारनं कितीही नियम लावले तर सर्व काही आपल्यावर आहे कोरोनाला हरवायचं असेल तर स्वतःलाच निर्बंध लावावे लागतील.