मुंबई : राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांना केलं आहे. 


कोविडच्य संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या 'माझा डॉक्टर' या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.


कार्यक्रमास आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहूल मेहता, यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, तिसरी लाट येऊच नये यासाठी  आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे. दुर्देवाने ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी यादृष्टीने उपाययोजना आणि प्रयत्न सुरु आहे.  आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे.जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.  तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक


सर्व रुग्णालयांनी ऑडिट करून घ्यावे


मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य सुविधा मग ते ऑक्सीजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स यात आपण कुठेही कमी नाही. पण या सगळ्या गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे, यंत्रसामग्रीची काळजी घेणे अत्यावश्यक. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी ऑडिट करून घ्यावे. गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्वाचे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली. आपली ऑक्सीजनची गरज अचानक वाढली. आपण इतर राज्यातून ऑक्सीजन मागवून घेऊन ही गरज भागवली. राज्याची ऑक्सीजनची क्षमता दररोज 1200 ते 1300 मे.टन ही गरज मागच्यावेळी 1700 ते 1800 मे.टन एवढी वाढली. इतर राज्यातून आपण ऑक्सीजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सीजन मिळत नाही, तो ऑक्सीजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे अशावेळी आपल्या ऑक्सीजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. 


मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळा सुरु आहे. डेंग्यु, मलेरिया चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज. कोविड नसला तरी डेंग्यु, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याची गरज आहे. लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी. राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की, अगदी राजकारण्यांनीही आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असं ते म्हणाले. कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खुप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. माझे- कुटुंब माझी जबाबदारी ही जशी महत्वाची गोष्ट आहे तशीच माझे गाव माझी जबाबदारी ही गोष्ट ही महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करावे, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की,  आता सणवाराचे दिवस सुरु. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.