Maharashtra Rain : राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलं आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे.  


सोलापुरात मुसळधार पावसाची हजेरी 
सोलापुरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. नरखेड भागातून वाहत असलेल्या सीना आणि भोगावती नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मालिकपेठ येथील कोल्हापूर पध्द्तीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यावर्षी प्रथमच बंधारा पाण्याखाली गेलाय. सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली.  गेल्या काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल रात्री माढा तालुक्यात तुफानी बरसात केल्याने  सीना  नदी दुथडी भरून वाहू लागली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी घुसले आहे . रात्रभर झालेल्या पावसामुळे माढा दारफळ व परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे . या पावसामुळे उसात पाणी शिरले असून उडीद पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. 


जालना जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर मुसळधार पाऊस, अंबड तालुक्यातील मांगणी,  गल्हाटी नदीला पूर 
जालना जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीने नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अंबड तालुक्यातल्या मांगणी आणि गल्हाटी नदीला या पावसाने रात्रीतून पूर आलाय. या भागातील नदीकाठच्या करंजळा आणि घुंगर्डे हदगाव या गावात पाणी शिरलं. तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने उभी पीक पाण्यात गेलीत. दरम्यान आजही पावसाचा अंदाज वर्तवल्याने प्रशासनाने  नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय.  


बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस


बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी गावात पाणी शिरलं आहे. तर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेवराई तालुक्यातल्या भोजगाव येथील अमृता नदीवरचा पूल वाहून गेल्याने नदीच पाणी गावात शिरल्याने अनेक घरांचं नुकसान झालं आहे तर शेतातले पीक देखील या पुरात वाहून गेल आहे. तर गोदावरी आणि सिंदफना नदीला पूर आल्याने देखील शेतीच मोठं नुकसान झालं आहे. मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गेवराई तालुक्यातील सातही लघुप्रकल्प एकाच रात्रीत तुडूंब भरले असून नदी, नाले तसेच अमृता नदी, गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. 


गोदावरी नदीला पाणी वाढल्याने राक्षसभुवन मधले गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या शनिमंदिर आला पाणी लागले असून पात्र कडील मंदिराचा भाग पाण्याखाली गेला आहेभोजगाव येथे अमृता नदीचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच गोदावरीला आपेगाव-हिरपुरी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, तसेच तालुक्यातील नद्यातून जाणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे गोदाकाठी असलेल्या राजापूरला पुन्हा एकदा पाण्याने वेढा घातला. याच पाण्याने पात्र सोडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


पुरामध्ये वाहून गेल्याने हिंगोली  जिल्ह्यातील दुसरा बळी


हिंगोली जिल्ह्यातील नंदगाव येथील शेतकरी संजय धनवे काल सायंकाळी शेतात जात असताना नदीला आलेल्या आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने वाहून गेले. रात्रीपासून त्यांचा शोध घेणे सुरू होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला.  काल झालेल्या पावसामुळे नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत पुरात वाहून मृत पावलेला हा दुसरा बळी आहे