Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.


शनिवारी राज्यात 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,27,265 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.12% एवढे झाले आहे. 


मुंबई-पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण -
राज्यात सध्या 626 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत सध्या 329 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 151 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 42 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगरमध्ये 27 तर बीडमध्ये 14 सक्रीय रुग्ण आहेत. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, औरंगाबाद , हिंगोली उस्मनाबाद, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा या ठिकाणी एकही सक्रिय रुग्ण नाहीत. इतर जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे. 


मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद -
राज्यात शनिवारी 98 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये 43 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपा 18 आणि पिंपरी चिंचवड 10 कोरोना रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आतमध्ये आहे. ठाण्यासह अनेक जिल्ह्यात कोरोनाचा आज एकही रुग्ण आढळला नाही. 


देशात गेल्या 24 तासांत 975 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
देशात गेल्या 24 तासांत 975 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. काल 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 747 वर पोहोचली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 747 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 7 हजार 831 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका झाला आहे.