मुंबई :  राज्यातील कोरोनाच्या (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय. राज्यात आज 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 263 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,292 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात आज 1439 सक्रिय रुग्ण


राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1439 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 857 सक्रिय रुग्ण हे मुंबईत  असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 281 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,37,502 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.


देशातील सध्याची स्थिती :


 देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण आढळले असून 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. त्या आधी काल देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 96 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 355 कोरोना रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 


देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 191 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.59 टक्के आहे. तर कोरोना संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्क्यावर पोहोचला आहे.  देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधित नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत 899 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे