मुंबई: देशात जरी कोरोना रुग्णांची (CoronaVirus) संख्या वाढत असली तरी राज्यात मात्र त्या उलट चित्र आहे. रविवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे. आज राज्यात 121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर 82 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


राज्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू


राज्यात आज  एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा  मृत्यू झाला नाही. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,209 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 8,03,96,726 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 78,79,278 इतकी झाली आहे.


राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1343 वर


राज्यातील सक्रिय (Active Patient) रुग्णसंख्या 1343 इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 822 रुग्ण हे मुंबईतील असून 285  रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत. 


 भारतात 3207 कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले


भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा घटताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3207 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण वाढ देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाली आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. देशातील नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 403 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात 3 हजार 410 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 24 हजार 93 इतकी झाली आहे.