Maharashtra Covid Restrictions : सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. आज 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. 


सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. 


मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


काय आहेत निर्बंध?
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.


राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटचं संकटही गडद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात काल गुरुवारी तब्बल  5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात काल 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे.  


राज्यात काल 198 ओमायक्रॉनबाधितांची नोंद - 
राज्यात  काल, गुरुवारी 198  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 450 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha