मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6,857  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 64 हजार 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53टक्के आहे. 


राज्यात आज 286 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (44), हिंगोली (33), यवतमाळ (6), गोंदिया (50), चंद्रपूर (33), गडचिरोली (801) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


भंडाऱ्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 677 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 73,69, 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,82, 914 (13.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,88,537 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,364व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 404 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 404कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 382रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,697 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,280 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1383 दिवसांवर गेला आहे. 


देशात गेल्या 24 तासांत 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 43, 654 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 41,678 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 84 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 22 हजार 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 63 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.