औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) औंरगाबादहून आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री या दौऱ्यात दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे.

  


मुख्यमंत्री दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. परंतु, हा दौरा अर्धवट सोडून ते आज ओरंगाबाद विमानतळावरूनच दिल्लीला रवाना झाले. "दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्याने आज लवकर जातोय पुढच्या वेळी दिवसभर येईन, असे आश्वास यावेळी शिंदे यांनी औरंगाबादच्या जनतेला दिले.  


एकनाथ शिंदे म्हणाले,  आमदार संदीपान भुमरे हे दिसायला साधा मानूस दिसतात. पण ते खूप हुशार आहेत. आम्ही हे काम लपून केलं नसून बिधास्त केलं आहे. त्यामुळे त्याची भीती वाटली नाही.  लोक विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात. पण आम्ही सत्तेपासून विरोधी पक्षात गेलो. आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा असता तर एवढा पाठिंबा मिळाला नसता. "


अचानक दिल्लीला रवाना
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना आता मुख्यमंत्री मराहाष्ट्र दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाला होता. परंतु, आज ते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गावरून औरंगाबाद विमानतळाकडे गेले आणि तेथून ते दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 


मुख्यमंत्री झाल्यापासून सहावा दिल्ली दौरा


मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत पाच दिल्ली दौरे झाले असून आताचा सहावा दौरा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसऱ्यांदा 8 जुलै रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अभित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा ते 18 जुलै रोजी रात्री दिल्लीला रवाना झाले आणि 19 जुलै रोजी दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.