मुंबई :  राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गिरीश बापट यांच्याकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची धुरा जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.


गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. तर बापटांकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची धुरा जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहे.

जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रालय सांभाळणाऱ्या विनोद तावडे यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालयाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपाध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, तसंच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जातं.

राधाकृष्ण विखेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, म्हणून प्रकाश मेहतांच्या खुर्चीवर टांगती तलवार आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे.