रायगड :  भाजप सत्तापिपासू नाही, हे सत्तेसाठी केलेलं परिवर्तन नाही.हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी हे परिवर्तन आहे.  असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 


सरकार यावे श्रीं' ची इच्छा 


महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये  अघोषित आणीबाणी होती,  अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार याविरुद्ध आपण अडीच वर्षे संघर्ष करत होतो.  राज्याची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटायचे. गेल्या अडीच वर्षात जो विकास थांबला होता.  हे सरकार यावे ही 'श्रीं' ची इच्छा होती.  ईश्वराला आपण मानतो पण हे सरकार यावं हे लोकांची इच्छा होती, असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 


शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली 


राज्याची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटायचे. प्रकल्प-योजना बंद,आणि भ्रष्टाचार सुरू होता.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असताना तोंड बांधून गप्प बसायचे. जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता तो हे सहन करू शकत नव्हता. राज्याच्या हितासाठीही करणं आवश्यक होते. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, पण हे अचानक घडलं नाही तर हे ठरवून घडलं. शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली आता जी शिंदे सोबत आहे ती खरी शिवसेना आहे.  


आपण सत्तेचा गड जिंकलो


पहिली कार्यकारिणी शिवाजी महाराज यांच्या रायगड जिल्ह्यात होत आहे याचा आनंद आहे. शिवाजी महाराज गड जिंकल्यानंतर थांबायचे नाही, आपण सत्तेचा गड जिंकला आहे आपण आता थांबायचं नाही. गेल्या अडीच वर्षात जो विकास थांबला होता तो पुन्हा एकदा पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्रात विकासाला पहिले आणायचे होते.  


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजप नेत्यांना सल्ला दिला आहे. अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्यावर वेगळे अर्थ काढले.  आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो माध्यमांचे काम असते.  हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील येईल.