मुंबई : क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. मात्र 'महाराष्ट्र बंद'साठी सकल क्रांती मराठा समाजाची आचारसंहिता आंदोलकांनी काही ठिकाणी भंग केल्याचं चित्र आहे.


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात हिंसक आंदोलन सुरु आहे. माढा ते शेटफळ रस्त्यावर उपळाई इथे मराठा आंदोलकांनी टायर जाळून रास्तारोको केला. त्यामुळे सकाळपासून इथे वाहतूक ठप्प आहे.

जालना : जालना-भोकरदन रस्त्यावरही टायर जाळून आंदोलकांचा ठिय्या सुरु आहे. परिणामी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम झाला आहे.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे. औंढा तालुक्यातील वागरवाडी, कनेरगाव, खटकली बायपास इथे आंदोलकांनी टायर जाळून रास्तारोको केला तर काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्याच्या मध्ये टाकण्यात आले. तसंच नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद, परभणी, अकोला मार्गावर रास्तारोको करण्यात आला.

अहमदनगर : राहाता तालुक्यातील साकुरी शिवारात अहमदनगर-मनमाड महामार्गावर मराठा आंदोलनकांनी टायर जाळून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला.

लातूर : लातूर जिल्ह्यतील ग्रामीण भागात मध्यरात्रीपासूनच आंदोलन पेटलं. साखरा पाटी इथे टायर जाळून रास्तारोको करण्यात आलं. परिणामी लातूर-बार्शी-पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तसंच उस्मानाबाद-पुणे-बार्शी-मुरुड इथे जाणारी आणि येणारी वाहने अडकून पडली होती.

'महाराष्ट्र बंद'साठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता
- बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
- कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये
- मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे
- कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
- पोलिस प्रशासनला सहकार्य करा
- बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
- अफवांवर विश्वास ठेवू नका
- मराठा सेवकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे
- बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन" असं नमूद केलं पाहिजे

कुठे कुठे इंटरनेट बंद?
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, औरंगाबाद इथली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही
आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.

अनेक शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे.
मात्र आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

मराठा आंदोलकांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.