Maharashtra Assembly Session:  शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) पार पडत आहे. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार आता सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे मागील अधिवेशनात त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली होती. आता, टीका केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्यांना करायची आहे. 


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. हे  अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. 


राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे किती आमदार आज फैसला? 


राष्ट्रवादी कॉग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नाही. अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटले. 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होईल. जितेंद्र आव्हाडांनी व्हीप जारी केला आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोडा मैदान लांब नाही उद्या समजेल काय आहे, असे सूचक वक्तव्य केले. 


काँग्रेस दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार?


अजित पवार सत्तेत सामिल झाल्यानंतर बदललेल्या समीकरणानुसार कॉग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा केला जाणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे विधान परिषद आमदार डॉ. निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषद विरोधी पक्षनेते पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप 22, काँग्रेस 9, ठाकरे गट 8, राष्ट्रवादी (पवार गट) 4, राष्ट्रवादी (अजितदादा गट) 5, शिवसेना 3, इतर 6 आणि 21 पद रिक्त आहेत.


विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप-प्रत्यारोप


सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मोठे असताना सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पाऊसमान कमी झाले आहे. तर, शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील दुर्देवी घटना अशा विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याची सुरूवात अधिवेशन सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे. मात्र, कमी झालेल्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आपला आवाज किती बुलंद करतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. 


तर, दुसरीकडे सभागृहात संख्येने जास्त असलेले सत्ताधारी आक्रमक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने विरोधकांचे अवसान गळाले आहे. विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. चांगल्याला चांगले म्हणायची जबाबदारी विरोधी पक्षाची असते असेही त्यांनी म्हटले. आम्ही फक्त आमच्या कुटूंबाची जबाबदारी घेतली नाही तर राज्यातील जनतेची जबाबदारी घेतली असून आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याचे काम आम्ही करत आहोत असेही त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, विरोधकाना व्यवस्थित उत्तर देऊ बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून घेऊन जाणार नाही. आम्हाला लोकशाही माहीत आहे त्यामुळे प्रश्न चांगल्या भावनेने सोडवू असेही त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून लोक आमच्याकडे येत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. विकासाच्या मुद्यावर अजित पवार आमच्या सोबत आलेत. एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रित निवडणूक लढलो होतो. अजित पवार आणि आमची राजकीय युती आहे. आता आम्ही तिघे एकत्र आलो असून आता आम्ही कूटनीति करणार आहोत असेही फडणवीस यांनी म्हटले. 


तर, विरोधी पक्षांनीदेखील या अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने ज्याला गट नेता म्हणून नाकारलं ते अजूनही मुख्यमंत्री म्हणून आहेत ते कलंकित आहे सरकार घटनाबाह्य असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.  शेतकऱ्यांचे कांदा अनुदान गेल्या अधिवेशनात सांगितले. मात्र, ते अद्यापही दिलं नाही कापसाला भाव नाही त्याचा निर्णय घेतला नाही. सगळे विरोधी पक्ष सोबत आहेत एकसंघ आहे संख्येवर जाऊ नका असेही त्यांनी म्हटले. महिला अत्याचार, शेतकरी अडचण, दंगली आणि अनेक प्रश्न आहेत जे अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत, असे काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.