Maharashtra Amravti News : अमरावती शहरात पहिली दंगल झाली आणि आता अचलपूर येथे तशीच परिस्थिती असून कर्फ्यु लावण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे अमरावती शहराचे नाव संपूर्ण राज्यासह देशात खराब होत असल्याची खंत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी व्यक्त केली आहे. तसेच, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री संपूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीकाही आमदार रवी राणा यांनी केली आहे. 


आमदार रवी राणा म्हणाले की, "अमरावती जिल्ह्यात सर्वात आधी अमरावती शहरात सर्वात आधी दंगल झाली. अचलपूरमध्ये ज्यापद्धतीनं दंगलीचं वातावरण आहे. तिथे कर्फ्यु लावण्यात आला आहे. वारंवार अशा पद्धतीनं तणावाचं वातावरण होणं, यामुळे अमरावती जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रासोबत देशातही नाव खराब होत आहे. यासाठी सर्वांनी पुढे येऊन शांततेचं आवाहन केलं पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात अमरावतीच्या पालकमंत्री अयशस्वी झाल्या आहेत. संपूर्ण अमरावतीत अवैध प्रकार सुरु आहेत. पोलिसांचा वापर राजकीय वापरासाठी करुन खोटे गुन्हे दाखल करणं, खोट्या पद्धतीनं सर्वांना तुरुंगात टाकणं आणि पोलिसांचा धाक जिल्ह्यात राहिलेला नाही."


"महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात नेहमी अशा दुर्घटना, असं तणावाचं वातावरण झालं आहे. यापूर्वी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी 5 वर्षांत कुठेही दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे कुठेना कुठे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. तसेच, अमरावतीत वारंवार अशा घटनांमुळे पालकमंत्रीही अपयशी ठरल्या आहेत.", असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :