BEED ACCIDENT :  कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बीडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अपघाताची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या जार जणांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


अंबाजोगाईहून नातेवाईकाचा अंत्यविधी उरकून कार चालक अलिम शेख आणी दीपक वैजनाथ राजारोशे अहंदपूरकडे कार  (एमएच 24 व्ही 2518 ) मध्ये बसून परत जात होते. त्यावेळी  कार चालवणाऱ्या अलिम शेख यांचा ताबा सुटला. नवाबवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस त्याने समोरुन जोराची धडक दिली. त्यानंतर घटनांदूर येथे मुख्य चौकात उभे असलेल्या चौघांना कारने जोराची धडक दिल्याने सौरभ सतीश गिरी(वय १९) लहू बबन काटुळे (वय ३०) हे दोघे जागीच ठार झाले. रमेश विठ्ठल फुलारी(वय ४५) यांना उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्याच त्याचा मृत्यू झाला .


या अपघातात कार चालक अलिम शेख(वय२५) दीपक वैजनाथ राजारोशे (वय ३५) (रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले आहे.  त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने  रस्त्यालगत असलेले लोखंडी खांब खाली पडला. लोखंडी खांब पडतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने घटनांदूर गावात शोकाकुल वातावरण झाले. त्यामुळे गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


या अपघातात मृत्यु झालेले लहू बबन काटूळे हे ऑटोरीक्षा चालक होते. त्यांच्या पश्चात आई,वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तर रमेश विठ्ठल फुलारी यांचा फुलाचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी,दोन मुलं असा परिवार आहे. त्यांच्या एकट्याच्या व्यवसायावरच कुटुंब चालायचं. या अपघातात मृत्यु झालेला सौरभ सतीश गिरी यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. एकाच गावातील सर्वसामान्य कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.