Amravati Ladki Bahin Yojana: अमरावती : राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मोठी घोषणा केली. आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, सोलापुरातील (Solapur News) केंद्रावर एजंटकडून 700 ते 1000 रुपये घेतले जात असल्याचं समोर आलं आहे. 


लाडक्या बहीणींची लूट, अमरावतीत व्हिडीओ व्हायरल 


अमरावतीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर आलं आहे. अमरावतीतील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेतले जात आहेत. पैसे घेतले जात असल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे. 


राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असुन राज्य भरामध्ये सर्वच महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळव करत आहेत. परंतु, वरूड तालुक्यात येत असलेल्या सावंगी गावातील तलाठी तुळशिराम कंठाळे हे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक लाभार्थी महिलांकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


सोलापुरात नोंदणीसाठी महा-ई सेवा केंद्रावर 700 ते हजार रुपयांचा दर 


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची सोलापूरच्या सेतू केंद्रवर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला मिळवण्यासाठी सेतू केंद्रावर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दाखला मिळवण्यासाठी महा-ई सेवा केंद्रावर एजंटकडून तब्बल 700 ते 1000 रुपये घेतले जातं असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सेतू केंद्रावर जास्त गर्दी होतं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. अनेक वयस्क आणि अशिक्षित महिलाकडे जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्यानं अडचणींचा सामना करावा लागतोय. 


लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीची अंतिम तारीख काढून टाकावी : पृथ्वीराज चव्हाण 


काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "यंदाच्या अंदाजपत्रकात शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. महिलांना मदत दिली पाहिजे, त्यात कुणाचंच दुमत नाही. या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 जुलै निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यांतील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी होईल, एवढी मोठी गर्दी दिसत आहे. काही ठिकाणी तर उन्हात उभं राहून महिलांना भोवळ येण्याची प्रकरणंही झालीत. त्यासोबतच पंढरीची वारी सुरू झाली असून गावागावांतून पालख्यांनी प्रस्थान केलं आहे. राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुरात दाखल होत असतात. त्यातील निम्या महिला असतात. आषाढी एकादशी 17 तारखेला आहे. त्यामुळे वारीतील महिलांना 15 तारखेपर्यंत अर्ज भरणं शक्य नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे ती, योग्य नाही. ही योजना सर्वांसाठी खुली असावी. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार आपण दिला पाहिजे. योजना फक्त निवडणुकीपुरती आणायची आणि नंतर बंद करायची, हे योग्य नाही."


"लाडकी बहीण योजनेमध्ये 21 वर्षांवरील अविवाहित महिलांना वगळलेलं आहे. त्यांचा दोष काय? एखाद्या महिलेनं जर ठरवलं असेल की, लग्न करायचं नाही. मग तिला ही मदत का मिळणार नाही? तसेच, 60 वर्षांवरील महिलांना जर कोणीही सांभाळणारं नसेल, तर त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे. त्यामुळे नोंदणीसाठीची अंतिम तारीख काढून टाकावी. आज नोंदणी केंद्राबाहेर एजंट्सचा सुळसुळाट झाला आहे. महिलांकडे अधिवासाच्या दाखल्यासाठी सातशे-आठशे रुपये मागितले जातात. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झाला आहे." , असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आजपासून ऑफलाईन अर्ज; पात्र, अपात्रतेचे निकष काय?