रायगड:  रायगड जिल्ह्यातील भिवपुरी इथं असलेल्या आषाणे धबधबा परिसराची एन्व्हायरमेंट लाईफ संस्थेच्यावतीनं स्वच्छता करण्यात आली.


या धबधब्याच्या परिसरातून तब्बल ट्रकभर कचरा काढण्यात आला. यात दारूच्या बाटल्यांचा सर्वाधिक समावेश होता.

मुंबईजवळच्या भिवपुरीच्या आषाणे धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटक मोठी गर्दी करत असतात. मात्र यातले बहुतांशी लोक इथं दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालतात. त्यात दारुच्या रिकाम्या बाटल्या तिथेच फोडून टाकल्या जातात. यामुळे पर्यटक काचा लागून जखमी होण्याचे प्रकारही अनेकदा घडतात. अनेक जण आजूबाजूच्या शेतांमध्ये पार्ट्या करून तिथेही दारुच्या बाटल्या टाकून देतात, यामुळे शेतकरीही जखमी होतात.



त्यामुळं 'एन्व्हायरमेंट लाईफ'ने हा कचरा साफ करून पर्यटकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. या मोहिमेत एन्व्हायरमेंट लाईफ संस्थेच्या स्वयंसेवकांसह ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.